ठाकरे बंधू एकत्र आल्यास काँग्रेसचं काय? पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, दोघांनी..

Prithviraj Chavan : राज्याच्या राजकारणात सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा (Uddhav Thackeray) सुरू आहेत. शनिवारी दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्रित विजयी मोर्चाही निघणार आहे. हिंदी सक्तीचा शासन आदेश सरकारने रद्द केल्याचा जल्लोष या माध्यमातून साजरा होणार आहे. तसेच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना मनसे युतीला महत्व प्राप्त झाले आहे. ही युती झाली तर महाविकास आघाडीतील अन्य पक्षांची भूमिका काय असेल याचीही चर्चा आहे. यातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी (Prithviraj Chavan) मोठे वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र (Raj Thackeray) येणे हा कौटुंबिक विषय आहे असे चव्हाण म्हणाले आहेत.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण यांनी या मुद्द्यावर सविस्तर मत व्यक्त केले. राज ठाकरे यांनी उबाठा बरोबर युती करण्यास काँग्रेसच्या काही नेत्यांचा विरोध आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत काँग्रेसच्या नेत्यांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. ठाकरे गटाने मनसेबरोबर युती करू नये असे मत काही जणांनी व्यक्त केले होते. या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी सावध वक्तव्य केले.
राज्यात 18 हजार शाळा बंद होणार? विधान परिषदेमध्ये एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितले
चव्हाण म्हणाले, शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे एकत्र येणे हा कौटुंबिक विषय आहे. ते एकत्र आल्यास पूर्वीची शिवसेनेची मते एकत्र होतील याचा त्यांना फायदा होईल. राज ठाकरेंबद्दल बोलताना चव्हाण म्हणाले, राज ठाकरे राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते आहेत. गर्दी खेचणारे नेते आहेत. ज्यावेळी त्यांची जाहीर सभा होते तेव्हा प्रचंड गर्दी असते. पण या गर्दीचे मतांत रुपांतर होत नाही. म्हणूनच आताच्या विधानसभेत त्यांचे अस्तित्व नाही.
दरम्यान, राज्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर बोलताना त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादीच्या (Nationalist Congress Party) दोन्ही गटांचे विलीनीकरण झाले आणि तो पक्ष एनडीए सोबत गेला तर महाराष्ट्रात काँग्रेसला (Maharashtra Congress) त्यांच्यासोबत युती कायम ठेवणे अवघड होईल.
वृक्षतोडीसंदर्भातील ‘तो’ निर्णय मागे, मुनगंटीवारांचा वनमंत्री गणेश नाईकांना घरचा आहेर